आंतरजातीय बंधनांना बळ: गडचिरोलीत 450 जोडप्यांना आर्थिक आधार

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजने अंतर्गत  गडचिरोलीत 450 जोडप्यांना 2 कोटी 25 लाखांचे अर्थसहाय्य”

गडचिरोली, 8 एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागा मार्फत राबवण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 450 आंतरजातीय विवाहित जोडप्यांना आर्थिक प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 50,000 रुपये या प्रमाणे एकूण 2 कोटी 25 लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. समाजातील जातिभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनाच्या उद्देशाने सुरू असलेल्या या योजनेमुळे सामाजिक समता, बंधुता आणि सलोखा निर्माण होण्यास मदत होत आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश समाजात जातीय अडथळे दूर करून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे हा आहे. यामुळे जोडप्यांना आर्थिक आधार मिळून त्यांचे जीवन सुलभ होईल, असा सरकारचा मानस आहे. योजने अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाचा निधी50:50 या प्रमाणात समान हिस्सा असतो. गडचिरोली जिल्ह्यातील पात्र जोडप्यांना हे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असून, ही प्रक्रिया 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण झाली आहे.

वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला शासनाकडून 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून जिल्ह्यातील 450 पात्र लाभार्थी जोडप्यांना लाभ देण्यात आला. विशेष म्हणजे, सन 2021-22 पासून प्रलंबित असलेल्या सर्व पात्र लाभार्थी जोडप्यांचा समावेशही यंदा करण्यात आला आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी मुळे प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली असून, अधिकाधिक जोडप्यांना लाभ मिळाला आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज यांनी या योजनेच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “ही योजना शासनाच्या सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनाला बळ देणारी आहे. यामुळे समाजातील जातीभेद दूर होण्यास मदत होईल आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे मनोबल वाढेल.” त्यांनी पुढे सांगितले की, या योजनेची माहिती सर्वांपर्यंतपोहोचावी आणि भविष्यात अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी नागरिकांना या योजनेसाठी पात्र असल्यास अर्ज करण्याचे आवाहन ही केले.

गडचिरोली सारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात ही योजना प्रभावी ठरत आहे. आर्थिकदृष्ट्या मागास आणि सामाजिक दबावाला सामोरे जाणाऱ्या जोडप्यांना या योजनेमुळे आधार मिळाला आहे. प्रत्येक जोडप्याला मिळालेले 50,000 रुपये त्यांच्या नव्याजीवनाची सुरुवात सुलभ करण्यास उपयुक्त ठरत आहेत. तसेच, समाजात आंतरजातीय विवाहांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माणहोत असल्याचे दिसून येत आहे.

गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि समाजकल्याण विभागाने या योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जागरूकता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना योजनेची माहिती मिळेल आणि ते पात्र असल्यास लाभ घेऊ शकतील. तसेच, शासनाने भविष्यात या योजनेचा विस्तार करून निधी वाढवण्यව

या योजने मुळे गडचिरोली सारख्या भागात सामाजिक बदलाची सुरुवात झाली असून, आर्थिक सहाय्यामुळे जोडप्यांना नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी आधार मिळत आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!