गडचिरोलीत सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक टप्पा: १९ सामाजिक उपक्रमांसाठी सामंजस्य करार

गडचिरोली, ७ जून : दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत १९ सामाजिक उपक्रमांसाठी सामंजस्य करार (MoU) संपन्न झाले. या करारांद्वारे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, सौरऊर्जा, जलसंधारण, पोषण, कृषी, ग्रामविकास आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये थेट स्थानिक जनतेला लाभ मिळणार आहे. शासन आणि खासगी क्षेत्र यांच्यातील या समन्वयामुळे गडचिरोलीत सामाजिक परिवर्तनाचा एक नवीन अध्याय सुरू होत आहे.
या करार सोहळ्याला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल उपस्थित होते. याशिवाय, विविध संस्थांचे प्रतिनिधीही या सोहळ्याला हजर होते.
प्रमुख उपक्रम आणि करार
1. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL): भाताच्या काड्यांपासून संकुचित बायोगॅस आणि इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक इंधन निर्मितीला चालना मिळेल.
2. हुंडई मोटर्स: जिल्ह्यातील २०० शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणार. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारेल.
3. क्लीनमॅक्स आणि फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स : ३०,००० पैकी १५,६०० स्वच्छ चुलींचे वाटप केले जाणार आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रदूषण कमी होईल.
4. एचडीएफसी लाइफ : गोंडेवाही येथे २०० एकरवर बांबू लागवड; पुढील टप्प्यात ५०० ते १००० एकरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
5. एस्सिलॉर फाउंडेशन : ‘सपनों का पिटारा’ उपक्रमांतर्गत शाळांमध्ये लायब्ररी आणि चष्म्यांचे वाटप, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर उंचावेल.
6. सेल्को इंडिया : १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौरऊर्जा प्रणाली बसवली जाणार असून, आणखी ३९ केंद्रांचा समावेश नियोजित आहे.
7. हिंदुस्तान युनिलिव्हर : मामा तलाव येथे जलसंधारण प्रकल्प, ज्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढेल.
8. नाबार्ड आणि बाईफ : ५० गोदामांचे बांधकाम, ज्यामुळे शेतमाल साठवण सुविधा सुधारेल.
9. अॅक्सिस बँक आणि बाईफ : ५,००० आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याचे उद्दिष्ट.
10. एसबीआय आणि बाईफ : १८,००० कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न.
11. वेदांता लिमिटेड: १०० अंगणवाड्यांचे नूतनीकरण, ९ जून २०२५ पासून सुरू होणार.
12. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प: ५ नवीन अंगणवाड्यांची उभारणी.
13. टाटा ट्रस्ट : स्थानिक शेतकऱ्यांमार्फत अन्न आणि पोषण उपक्रम.
14. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: युवकांसाठी रोजगारक्षम प्रशिक्षण, ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील.
15. प्राज इंडस्ट्रीज : महुआ फुलांपासून जैवइंधन निर्मिती, स्थानिक संसाधनांचा उपयोग करून आर्थिक विकासाला चालना.
16. झोमॅटो : ५०० हेक्टरवर कृषिवनशैली (अॅग्रोफॉरेस्ट्री) प्रकल्प.
17. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन : आदिवासी वसतिगृहांचे बांधकाम.
18. एचडीएफसी बँक आणि डब्ल्यूओटीआर : ‘परिवर्तन’ उपक्रमांतर्गत ग्रामविकास.
19. राष्ट्रीय विमा संस्था आणि बाईफ : महिला सक्षमीकरण आणि पोषण कार्यक्रम.
या करार सोहळ्याला हुंडईचे सीएसआर व्यवस्थापक शौरभ शर्मा, सुविधाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पांडे, फार्मर्स फॉर फॉरेस्ट्सचे वरिष्ठ व्यवस्थापक अश्वनी परमार, क्लीनमॅक्सचे उपमहाव्यवस्थापक संदीप साहा, बीपीसीएलचे राज्य समन्वयक संतोष निवेंडेकर, बायोफ्युएल्सचे कार्यकारी संचालक पी. अनिलकुमार, डब्ल्यूओटीआरचे गणपत काबाडी, प्रकाश केसकर, आरती खडसे, बाईफचे भारत काकडे, रविराज जाधव, शैलेश भगत, सेल्को इंडियाचे अमोघ ममदापुर, झोमॅटोचे परशुराम कुलकर्णी, नेचर इन्स्टिट्यूटचे संदीश पाटील, वेदांता लिमिटेडचे धृबनारायण मुखर्जी, नंद घर, शशी अरोरा, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे अशुतोष शेओपुरे, अॅक्सिस बँकेचे अद्वैत मजुमदार आणि कपिल भात्रा, तसेच तहसीलदार मोहनिष शेलवटकर उपस्थित होते.
“हे उपक्रम गडचिरोलीच्या स्थानिक जनतेसाठी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. विशेषत: आदिवासी आणि ग्रामीण समुदायांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी शासन आणि खासगी क्षेत्र यांच्यातील हा समन्वय एक यशस्वी मॉडेल ठरेल, अशी अपेक्षा आहे. या करारांमुळे गडचिरोली जिल्हा विकासाच्या नव्या वाटेवर पुढे जाण्यास सज्ज झाला आहे.”