March 7, 2026

शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी केवळ कर्तव्य नाही, तर त्यांचे भविष्य घडवणारे अत्यंत महत्त्वाचे साधन – माजी आमदार दीपकदादा आत्राम”

अहेरी, आनंद दहेगांवकर , प्रतिनिधी , ३  जुलै : “शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी केवळ कर्तव्य नाही, तर त्यांचे भविष्य घडवणारे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे,” असे प्रेरक उद्गार माजी आमदार दीपकदादा आत्राम यांनी काढले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी यांच्या वतीने शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, पेरमिली येथे आयोजित प्रवेशोत्सव सोहळ्यात त्यांनी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ आणि शैक्षणिक साहित्य देऊन उत्साहपूर्ण स्वागत केले. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,” असे सांगत त्यांनी शिक्षणाच्या सामर्थ्यावर जोर दिला.

दीपकदादा आत्राम यांनी आपल्या संबोधनात शिक्षणाचे मोल अधोरेखित केले. “वाचन आणि लेखन ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. शिक्षणामुळे व्यक्ती साक्षर होऊन स्वावलंबी बनते. हे गरिबी आणि बेरोजगारी दूर करण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे,” असे ते म्हणाले. शिक्षणामुळे व्यक्तीला माहितीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते, ज्यामुळे यशाचे प्रमाण वाढते आणि जीवनमान सुधारते. “एखाद्या देशात शिक्षणाची पातळी जितकी उच्च, तितकी विकासाची शक्यता जास्त,” असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षणाद्वारे करिअरच्या संधी मिळतात, ज्यामुळे व्यक्ती आणि समाजाचे जीवनमान उंचावते, असेही त्यांनी नमूद केले.

या सोहळ्यात २०२४-२५ शैक्षणिक सत्रात इयत्ता १० वी आणि १२ वी मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा दीपकदादा आत्राम यांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन दिले. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले आणि इतरांना प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. मावलीकर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. चिमुरकर आणि आभारप्रदर्शन श्री. मेडी यांनी केले. मंचावर सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. सुहास वसावे, पालक श्री. जोगा मिच्छा, अधिक्षक श्री. भोये, पालक श्री. रमेश सडमेक, श्री. जुलेख शेख, श्री. संजय आक्केवार, माजी सरपंच विजय कुसनाके, श्री. यादावार, श्रीमती मुळावार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गावकरी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रवेशोत्सवाने अहेरी परिसरात शैक्षणिक जागृतीला चालना मिळाली. आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हा पाया असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण होतो आणि पालकांना त्याचे महत्त्व पटते, असे मत व्यक्त झाले. हा सोहळा नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात ठरला, ज्याने शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!