पूरग्रस्तांना दिलासा: भाग्यश्री ताईंची तात्काळ मदतीची मोहीम
आनंद दहागावकर, अहेरी, २६ जुलै : अहेरी उपविभागात पहिल्या टप्प्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्वदूर पाऊस पडला असला तरी अहेरी उपविभागात पावसाने कहर केला, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आलापल्ली येथील प्रभाग क्र. ५ मधील फुकट नगर परिसरात तलावाच्या पाण्याचा ओव्हरफ्लोमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
या संकटकाळात शरदचंद्र पवार गटाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांनी तात्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि १७ पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि इतर तात्काळ मदत पुरवली. यावेळी एकूण ६४ नागरिकांना त्यांच्या मदतीचा लाभ मिळाला.
भाग्यश्री ताईंनी प्रशासनाला पूरग्रस्तांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. “पुढील काळात कोणतीही अडचण आली तरी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन,” असे आश्वासन त्यांनी पूरग्रस्तांना दिले.
या मदतकार्यावेळी नरेश मादेशी, विजय कोहराम, मडावीताई, सुंगधा आत्राम, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भाग्यश्री ताईंच्या या तात्काळ आणि संवेदनशील कृतीमुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
