सायबर सुरक्षा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“गृह विभागाने पुढील १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढाव

मुंबई, ५ जानेवारी : महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे गृह विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित गव्हर्नन्स, रिस्क व कंम्प्लायन्स करण्यात यावे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करिता नवीन पदे निर्माण करावी. नक्षलविरोधी उपक्रमांमध्ये नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये नवीन सशस्त्र चौक्या उभारण्याच्या कामाला गती द्यावी तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र कारागृह नियमावलीचे प्रारुप तयार करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त सर्व प्रयोग शाळांचे संगणकीकरण करणे सुरू आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या पाच प्रयोग शाळांचे संगणकीकरण तसेच प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे प्रकल्पाचे डाटा सेंटर उभारण्यात आले आहे, अशी माहिती गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांनी दिली. यावर अमरावती, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, चंद्रपूर या प्रयोगशाळांचे संगणकीकरण करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ.पंकज भोयर, गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!