April 25, 2025

नाली बांधकाम रखडले: नागरिक त्रस्त, प्रशासनावर संतापाचा उद्रेक!

कुरखेडा, एप्रिल : प्रभाग क्रमांक १७ मध्ये गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळापासून रखडलेले नाली बांधकाम पूर्ण करण्याची मागणी येथील नागरिकांनी तीव्रतेने लावून धरली आहे. खोदकाम करून ठेवलेल्या नाल्या अद्याप बांधून पूर्ण झाल्याने स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या प्रलंबित कामामुळे लहान मुलांना खोदलेल्या जागेत पडून दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

प्रस्तावित नाली बांधकाम सिराज शेख ते देविकर यांच्या घरापर्यंत करण्याचे नियोजित असून, यासाठी कंत्राटदाराने साहित्यहीआणून ठेवले आहे. मात्र, प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात सातत्याने विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. “साहित्य आणून ठेवले आहे, पण काम सुरूच होत नाही. हा विलंब आमच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.

नागरिकांनी या समस्येसाठी नगरपंचायतच्या ढिसाळ प्रशासनाला आणि संबंधित कंत्राटदाराला जबाबदार ठरवले आहे. या शिवाय, या प्रकल्पाच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या अभियंत्यावरही नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. “कंत्राटदार आणि अभियंता दोघेही या अव्यवस्थेला कारणीभूत आहेत. कामाचा दर्जा आणि वेळापत्रक याकडे कोणाचेही लक्ष नाही,” अशी टीका एका नागरिकाने केली.

खोदलेल्या जागे मुळे रस्त्यावरून चालणेही कठीण झाले असून, पावसाळ्या पूर्वी हे काम पूर्ण झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. “लहान मुलांना धोका आहे, आणि रस्त्यावरून येजा करताना अपघात होण्याची भीती आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे,” अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

नगरपंचायत प्रशासनाच्या या उदासीनते मुळे हा नाली बांधकाम प्रशासकीय अकार्यक्षमतेचा आणखी एक नमुना ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पूर्वीही अनेक बांधकामांमध्ये असाच विलंब आणि गैरव्यवस्थापन दिसून आले असल्याने प्रशासनावरील विश्वास उडत चालला आहे.

नागरिकांनी आता प्रशासनाला अल्टिमेटम देताना म्हटले आहे की, नाली बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून त्यांच्या अडचणी दूर कराव्यात. “आम्ही कर भरतो, पण मूलभूत सुविधांसाठीही आम्हाला संघर्ष करावा लागतो. ही परिस्थिती अस्वीकार्य आहे,” असे एका रहिवाशाने स्पष्ट केले.

या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. मात्र, नागरिकांच्या वाढत्या दबावा मुळे प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. नाली बांधकाम पूर्ण होईपर्यंत येथीलर हिवाशांचा त्रास कमी होण्याची शक्यता दिसत नाही. प्रशासन या मागणीला किती गंभीरपणे घेते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!