March 7, 2026

देसाईगंज बोगदा पुन्हा पाण्यात: कोट्यवधींची उधळपट्टी, प्रशासनाचा फज्जा!

Screenshot

देसाईगंज, ९ जुलै : शहरातील बोगद्याच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नगर प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्चून मोठ्या थाटामाटात काम पूर्ण केल्याची घोषणा केली होती. मात्र, पावसाच्या पहिल्याच सरीत बोगदा पाण्याने तुडुंब भरला आणि कोट्यवधी रुपये खर्चूनही समस्येचं निराकरण न झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं.

काही महिन्यांपूर्वी पंधरा दिवस बोगदा बंद ठेवून ढोलताशांनी उद्घाटन झालेल्या या कामाची पोलखोल झाली आहे. पाण्यात गाड्या बंद पडत आहेत, नागरिक अडकत आहेत, आणि वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांचे हाल सुरूच आहेत.

काँग्रेसचे युवा नेते पिंकू भाऊ बावणे यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत नगर प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “कोट्यवधी रुपये खर्चूनही जर बोगदा पाण्यात बुडत असेल, तर हा थेट भ्रष्टाचार आहे. लोकांच्या पैशाचा हा अपमान आहे!” असं त्यांनी ठणकावलं. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

नागरिकांमध्येही संतापाचं वातावरण आहे. हे काम कोणत्या ठेकेदाराने आणि कोणत्या अधिकार्‍याच्या देखरेखीखाली झालं, याची चौकशी होणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. विकासाच्या नावाखाली केवळ घोषणाबाजी आणि धूळफेक सुरू असल्याचं देसाईगंजकरांचं म्हणणं आहे. नगर प्रशासनाचा हा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!