घरकुल ते पायाभूत सुविधा : गडचिरोलीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध

“गडचिरोलीच्या विकासाचे स्वप्न लवकरच साकार : सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची महाराष्ट्र दिनी ग्वाही”
गडचिरोली, १ मे : “सामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण योजनांद्वारे हे स्वप्न लवकरच साकार होईल,” अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्र दिनी दिली. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६व्या वर्धापनदिनानिमित्त गडचिरोलीत आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना ॲड. जयस्वाल म्हणाले, “प्रधानमंत्री आवास योजना, पी.एम. जनमन, मोदी आवास, रमाई, शबरी आणि आदिम आवास योजनांमधून शासन सामान्य माणसाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करत आहे. गेल्या काही वर्षांत या योजनांमध्ये भरीव प्रगती झाली आहे.”
गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंत्री विशेष लक्ष देत असून, प्रशासनाला गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. “भविष्यात गडचिरोली जिल्हा इतर आघाडीच्या जिल्ह्यांच्या बरोबरीने प्रगती साधेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. जयस्वाल यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार आणि दुर्गम भागांसाठी पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले.
“शासनाच्या या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल,” असे आश्वासन देत ॲड. जयस्वाल यांनी आपले भाषण संपवले.