पावसाळ्यात वीज पडण्याचा धोका! गडचिरोली प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

गडचिरोली, २७ मे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज पडण्याच्या वाढत्या घटनांमुळे गडचिरोली जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून जीवितहानी आणि नुकसान टाळता येईल.
प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शेतात किंवा तलावात काम करताना वीज पडण्याची शक्यता दिसल्यास तात्काळ कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. शेतात असताना पायाखाली लाकूड, प्लास्टिक किंवा कोरडा पाला ठेवून, दोन्ही पाय एकत्र करून, गुडघ्यावर हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवावे, परंतु डोके जमिनीला स्पर्श होऊ नये. धातूच्या कृषी यंत्रांपासून, लोखंडी पाईप्सपासून आणि लोखंडी तारांच्या कुंपणांपासून दूर राहावे, कारण यामुळे वीज आकर्षित होऊ शकते. तसेच, धातूच्या छत्र्या, विजेचे खांब, झाडाखाली किंवा उंच जागा टाळाव्यात.
घरात असताना विजेवर चालणारी उपकरणे, पाण्याचे नळ, टेलिफोन, फ्रिज यांना स्पर्श करू नये. कपडे वाळवण्यासाठी सुतळीचा वापर करावा आणि घरोघरी वीज अटकाव यंत्रणा (लाइटनिंग अरेस्टर) बसवण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. झाडांच्या सुरक्षेसाठी तांब्याची तार फांदीला बांधून दुसरे टोक जमिनीत खोल पुरावे, ज्यामुळे वीज झाडावर न पडता जमिनीत उतरेल.
वाहनात प्रवास करताना वीज सुरू असल्यास वाहनातच थांबावे आणि धातूच्या वस्तू हातात ठेवू नयेत. जंगलात असल्यास उंच झाडांपासून दूर राहून कमी उंचीच्या झाडांचा आसरा घ्यावा. पाण्याचे स्त्रोत, दलदलीची ठिकाणे आणि मोकळ्या जागा टाळाव्यात. मोकळ्या आकाशाखाली असल्यास खोलगट जागा निवडावी आणि एकत्र उभे न राहता व्यक्तींमध्ये किमान १५ फूट अंतर ठेवावे. पाण्यात पोहणाऱ्यांनी किंवा मासेमारी करणाऱ्यांनी तात्काळ बाहेर यावे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. “आपली सतर्कता हीच आपली सुरक्षा,” असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांपासून बचावासाठी सर्वांनी सजग राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.