हर घर तिरंगा’ रॅलीने गडचिरोलीत जागवली देशभक्तीची लहर
गडचिरोली, १३ ऑगस्ट : राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय यांच्या निर्देशनाखाली गोंडवाना विद्यापीठांतर्गत आदर्श पदवी महाविद्यालयातर्फे आज ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजता विद्यापीठ परिसरातून सुरू झालेल्या या रॅलीने देशभक्तीचा उत्साह संपूर्ण परिसरात पसरवला.
विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय” आणि “हर घर तिरंगा… घर घर तिरंगा” अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले. प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करतानाच, ध्वजाचा अवमान टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. रॅलीने विद्यापीठ परिसर, कलेक्टर कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा सत्र न्यायालय या मार्गांचा समावेश करत जोशपूर्ण मार्गक्रमण केले.
या रॅलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना जागृत करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे हा होता. प्राचार्य डॉ. श्याम खंडारे, कार्यक्रम अधिकारी प्रा. अंतबोध बोरकर, प्रा. मनिषा पिपरे, प्रा. सुदर्शन जानकी, प्रा. प्रणिता चंदनखेडे, प्रा. अजय राठोड, प्रा. नितीन चौधरी, प्रा. ऋतिक कोहळे, प्रा. मंगेश कडते, प्रा. पंकज राऊत, प्रा. मनोज बिरहारी, प्रवीण गिरडकर यांच्यासह कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रॅलीत तरुणाईचा जोश, राष्ट्रप्रेमाचा संदेश आणि तिरंग्याचा मान यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. गडचिरोलीच्या रस्त्यांवर तिरंग्याची शान आणि देशभक्तीचा उत्साह यांनी एक अनुपम वातावरण निर्माण केले.
