सिरोंच्यात पूराचा धोका: मेडिगड्डा बॅरेजमधून 5-7 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, प्रशासन सतर्क
सिरोंचा, १७ ऑगस्ट : भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, पुढील 1-2 दिवसांत अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य गोदावरी उपखोऱ्यातील अतिवृष्टीमुळे तेलंगणा राज्यातील कड्डम आणि श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले असून, विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. वर्धा, वैनगंगा आणि प्राणहिता नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसामुळे या नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
पुढील 15 ते 20 तासांत मेडिगड्डा बॅरेज येथील पाण्याचा विसर्ग 5 ते 7 लाख क्युसेक्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सिरोंचा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थ स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. प्रशासनाने महसूल, पोलीस, ग्रामपंचायत आणि इतर यंत्रणांना सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तहसिलदार, सिरोंचा यांनी सर्व संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून, पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी नदीकाठच्या भागात सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
