September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

सिरोंचा सीमाभागात तांदळाच्या ‘साम्राज्या’ची चर्चा; यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

रात्रीच्या अंधारात अवजड वाहनांची ये-जा; गोदामे, बाजार समितीच्या पावत्या, जीएसटी व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी

गडचिरोली : एखाद्या दक्षिणात्य चित्रपटातील प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहावा, अशी परिस्थिती सिरोंचा-तेलंगणा-छत्तीसगड सीमाभागात असल्याची चर्चा सध्या स्थानिक पातळीवर रंगली आहे. रात्रीच्या अंधारात सुरू असलेली अवजड वाहनांची ये-जा, गोदामांमध्ये होणारी तांदळाची मोठ्या प्रमाणातील उलाढाल, सीमाभागात फिरणाऱ्या कथित गुंडांची दहशत आणि या संपूर्ण व्यवहाराभोवती निर्माण झालेले संशयाचे वातावरण यामुळे प्रशासनासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.

स्थानिक पातळीवर ‘विरेन’ नावाच्या व्यक्तीभोवती या तांदूळ व्यवहाराचे मोठे जाळे असल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चेतील आरोपांची अधिकृत सत्यता तपासणे आवश्यक असून, संबंधित यंत्रणांनी निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

बारा वर्षांपासून व्यवहार सुरू असल्याची चर्चा

स्थानिक माहितीनुसार, सुमारे २०१५ च्या आसपास ‘विरेन’ तेलंगणा राज्यातील करीमनगर परिसरातून महाराष्ट्राच्या सीमाभागात आल्याची चर्चा आहे. त्यानंतर सिरोंचा परिसरात तांदळाचे व्यवहार वाढत गेल्याचे सांगितले जाते.

दररोज मोठ्या क्षमतेच्या वाहनांमधून तांदूळ विविध दिशांनी रवाना होत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. गोंदिया, वडसा, ब्रह्मपुरीपासून छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणापर्यंत या व्यवहाराचे जाळे असल्याची चर्चा आहे.

मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात अनेक वर्षे व्यवहार सुरू असल्यास त्याची नोंद संबंधित शासकीय यंत्रणांकडे आहे का? व्यवहारासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, वाहतूक परवाने, बाजार समितीच्या नोंदी आणि कर व्यवहार यांची नियमित तपासणी झाली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

बाजार समितीच्या नोंदींचीही तपासणी गरजेची

या संपूर्ण प्रकरणात सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोंदींची तपासणी करण्याची मागणी पुढे येत आहे. तांदळाच्या व्यवहारांसाठी बाजार समितीच्या पावत्यांचा वापर झाला का, कोणत्या व्यापारी अथवा फर्मच्या नावाने व्यवहार झाले, मालाचा स्रोत आणि अंतिम बाजारपेठ कोणती होती, याचा तपशील तपासल्यास चित्र स्पष्ट होऊ शकते.

स्थानिक चर्चेनुसार वीरभद्रा, जानकी आणि सुमंगली या नावांशी संबंधित व्यवहारांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. तसेच मोठ्या आर्थिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर संबंधित फर्मची जीएसटी नोंदणी, रिटर्न, ई-वे बिल, बँक व्यवहार आणि प्रत्यक्ष मालवाहतूक यांचा ताळमेळ तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

‘उलाढाल एका विशिष्ट मर्यादेपेक्षा वाढल्यानंतर फर्म बदलली जाते’ या आरोपाचीही संबंधित कर यंत्रणेकडून स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे.

रात्रीच्या वाहतुकीमुळे संशयाला बळ

सिरोंचा शहराला जोडणाऱ्या विविध मार्गांवर रात्रीच्या वेळी अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही नागरिकांना कथितरीत्या धमकावले जाते किंवा वाहन अंगावर घालण्याची भाषा केली जाते, अशा तक्रारी असल्याचेही सांगितले जाते.

कलेश्वर रोड, मंचेरियल रोड, राजीव नगर परिसरासह अन्य मार्गांवर रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या वाहतुकीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

गोदामांमध्ये बाहेरील जिल्हे व राज्यांमधून आणलेले कामगार कार्यरत असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे गोदामांमधील मालाची आवक-जावक, साठवणूक, वजन काट्यांच्या नोंदी आणि वाहनांच्या फेऱ्यांची माहिती तपासल्यास प्रत्यक्ष व्यवहाराचे प्रमाण समोर येऊ शकते.

महामार्ग बंद असतानाही वाहतूक?

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही कारणांनी बंद असतानाही पर्यायी मार्गांचा वापर करून छत्तीसगड व मध्य प्रदेशाच्या दिशेने तांदळाची वाहतूक होत असल्याचा दावा केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर गोदामे, वाहने, वे-ब्रिज, बाजार समितीच्या पावत्या, जीएसटी व्यवहार, ई-वे बिल आणि संबंधित बँक खात्यांची तपासणीकरण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या सर्व कागदपत्रांचा परस्पर ताळमेळ घातल्यास तांदळाची वास्तविक खरेदी-विक्री किती, वाहतूक किती आणि आर्थिक उलाढाल किती झाली, हे स्पष्ट होऊ शकते.

प्रशासनाला माहिती नव्हती का?

गेल्या बारा वर्षांपासून एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदळाचे व्यवहार सुरू असल्याची चर्चा असेल, तर संबंधित विभागांना याची माहिती नव्हती का?

बाजार समितीच्या नोंदी कोण तपासत होते? तांदूळ कुठून खरेदी झाला आणि कुठे विकला गेला? किती मालाची वाहतूक झाली? कोणत्या फर्मच्या नावाने किती व्यवहार झाले? जीएसटीमध्ये किती उलाढाल दाखवण्यात आली? बँक व्यवहार आणि प्रत्यक्ष मालवाहतूक यामध्ये ताळमेळ आहे का?

या प्रश्नांची उत्तरे निष्पक्ष चौकशीतूनच समोर येऊ शकतात.

नक्षलवाद्यांशी संबंधांच्या चर्चेचीही चौकशी आवश्यक

यासोबतच सिरोंचा आणि लगतच्या जंगल परिसरात संबंधित व्यक्तीकडून नक्षलवाद्यांना मदत केल्याच्या स्थानिक पातळीवरील चर्चांचाहीउल्लेख होत आहे. मात्र, अशा गंभीर आरोपांना कोणताही निष्कर्ष मानण्यापूर्वी अधिकृत तपास आणि ठोस पुरावे आवश्यक आहेत.

तांदळाची वाहतूक, आर्थिक व्यवहार आणि जंगलालगतच्या भागातील हालचाली यांचा अशा चर्चांशी काही संबंध आहे का, याची स्वतंत्रपणे सुरक्षा यंत्रणांकडून पडताळणी होणे गरजेचे आहे.

साम्राज्य’ नेमके कोणाचे? चौकशीने उलगडा होण्याची शक्यता

हा विषय केवळ तांदळाच्या कथित अवैध व्यवहारापुरता मर्यादित राहिलेला नाही. सीमाभागातील प्रशासनाची कार्यपद्धती, बाजार समितीच्या नोंदी, मोठ्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा, वाहतूक व्यवस्था, नागरिकांच्या कथित तक्रारी आणि नक्षलवाद्यांशी संबंधांबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

त्यामुळे सिरोंचा सीमाभागातील गेल्या काही वर्षांतील तांदूळ व्यवहारांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

चौकशीदरम्यान बाजार समितीच्या नोंदी, जीएसटी रिटर्न, ई-वे बिल, वे-ब्रिज रेकॉर्ड, गोदामांची कागदपत्रे, वाहनांची माहिती आणि संबंधित आर्थिक व्यवहार यांचा एकत्रित तपास झाला, तर या संपूर्ण व्यवहाराचे खरे स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सिरोंचाच्या सीमाभागात वर्षानुवर्षे एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असतील, तर त्यामागे नेमकी यंत्रणा कोणती आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी आतापर्यंत काय केले? — या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाने द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!