वडसा जंगल स्वाहा: वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे जैवविविधता धोक्यात

वडसा, ७ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वन परिक्षेत्रात लागलेल्या भीषण वणव्याने संपूर्ण जंगल स्वाहा झाले असून, यामागेवन विभागाची निष्क्रियता कारणीभूत ठरल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून भडकलेल्या याआगीमुळे शेकडो हेक्टर जंगल नष्ट झाले असून, जैवविविधतेला मोठा धक्का बसला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मोहफुले आणि तेंदू पाने गोळा करण्यासाठी स्थानिकांनी जंगलात आग लावली. कोरड्या हवामानामुळे ही आग वेगाने पसरली आणि वडसा वन परिक्षेत्रातील दाट जंगलाला भस्मसात केले. साग, साल, बांबू आणि औषधी वनस्पतींसहअनेक दुर्मिळ प्रजाती या आगीत नष्ट झाल्या आहेत.

या संकटाला सामोरे जाण्यासाठी वन विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका होत आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, वनविभागाला आगीची पूर्वसूचना असूनही वेळीच कारवाई करण्यात आली नाही. “आग सुरू झाल्यापासून आम्ही वन अधिकाऱ्यांना सांगत होतो, पण त्यांनी दुर्लक्ष केले. आता आमचे जंगल उद्ध्वस्त झाले,” असे एका ग्रामस्थाने संतापाने सांगितले.

या आगीमुळे वनस्पती, प्राणी आणि पर्यावरण साखळीवर गंभीर परिणाम झाला आहे. पाणवठे नष्ट झाल्याने प्राण्यांना भटकावेलागत आहे, तर लहान जीव आणि कीटकांचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, वन विभागाच्या सक्रियतेने हे नुकसान टाळता आले असते.

जंगल आमच्या जीवनाचा आधार आहे. वन विभागाने आम्हाला वाऱ्यावर सोडले,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. मोह आणि तेंदू पानांसाठी आग लावण्याच्या प्रथेवर नियंत्रण ठेवण्यातही वन विभाग अपयशी ठरल्याचा आरोप आहे. काहींनी तर अधिकाऱ्यांवर हितसंबंधांचा संशय व्यक्त केला आहे.

या घटनेने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वणवे टाळण्यासाठी कठोर कायदे, नियमित देखरेख आणि स्थानिकांना जागरूक करण्याची गरज आहे. जर वन विभागाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर वडसा वन परिक्षेत्रातील जैवविविधता कायमची नष्ट होण्याचा धोका आहे. या वणव्याने निसर्गाचे नुकसान तर केलेच, पण वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे जनतेचा विश्वासही डळमळीत झाला आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!