गडचिरोलीत तलाव पुनरुज्जनाला गती : जलरथाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा

गडचिरोली, २५ एप्रिल : गावागावातील तलावांना नवसंजीवनी देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या महत्वाकांक्षी योजनेच्या प्रचारासाठी तयार केलेल्या जलरथाला आज जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. या योजनेमुळे जिल्ह्यातील तलावांचे पुनरुज्जन होऊन शेतीला समृद्धी मिळणार आहे.
जलसंधारण अधिकारी अमित राऊत, व्ही.बी. सयाम, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा, डॉ. गणेश जैन, निरज बोथरा यांच्यासह अनेक अधिकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या योजनेंतर्गत तलावातील गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन उचलणार असून, त्यासाठी एकसमान दर निश्चित करण्यात आले आहेत. ग्रामपंचायती आणि पात्र स्वयंसेवी संस्थांना जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज करून काम सुरू करता येणार आहे.
विशेष म्हणजे, तलावातील गाळ शेतात नेण्यासाठी अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दराने अनुदान दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी सुपीक गाळ मोफत उपलब्ध होऊन उत्पादनात वाढ होईल.
योजनेचा व्यापक प्रचार, जनजागृती आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन आणि भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार तयार केलेला जलरथ गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन योजनेची माहिती पोहचवणार आहे. गावातील सरपंच ‘बीजेएस डिमांड ॲप’ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी जिल्हा समन्वयक राजनबोरकर आणि बीजेएसचे कार्यकर्ते ग्रामपंचायती, शेतकरी आणि प्रशासनाला मार्गदर्शन करणार आहेत.
“ही योजना ग्रामीण भागातील जलसंधारण आणि शेतीच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल,” असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडायांनी सांगितले. जलरथाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात जलक्रांतीला चालना मिळणार असून, शेतकऱ्यांच्या समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे.