भयानक! जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह पुरुषास जिवंत जाळले

गडचिरोली (gadchiroli news) : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम ग्रामीण भाग हा आजही अंधश्रद्धेने पछाडलेला असून अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे जादूटोणा केल्याच्या संशयातून एका पुरूषासह महिलेस जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना आज 3 मे रोजी उघडकिस आली आहे.
पोलिसांनी या घटनेतील १५ आरोपींना जेरबंद केले असून भयंकर बाब म्हणजे मृत महिलेच्या पतीसह मुलाचा आरोपींत समावेश आहे. जननी देवाजी तेलामी (५२), देवू कटयी आतलामी (५७, दोघे रा. बारसेवाडा) अशी मयतांची नावे आहेत. एटापल्लीपासून १० किलोमीटर अंतरावर वनगट्टा ते चंदनवेली या मार्गावर बोलेपल्ली हे गाव आहे. गावातील एका कुटुंबातील एका महिलेचा गर्भपात झाला. त्यानंतर महिन्यापूर्वी एका महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला होता. १ मे रोजी याच कुटुंबातील दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.
हे मृत्यूसत्र जादूटोणा केल्याने होत असल्याचा संशय त्या कुटुंबाला होता. यातून १ मे रोजी जननी तेलामी व देवू आतलामी यांना रात्री साडेसहा वाजता घरी जाऊन मारहाण केली. त्यानंतर गावापासून एक किलमीटर अंतरावरील नाल्यात नेऊन जिवंत जाळण्यात आले. यात दोघांचाही मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न केला, पण मयत जननी हिचा भाऊ शाहू मोहनंदा (रा. वासामुंडी) यांनी एटापल्ली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. १ ५ जण पोलिसांच्या ताब्यात असून आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी अहेरीचे अपर अधीक्षक एम. रमेश, एटापल्लीचे उपअधीक्षक चेतन कदम यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक नीलकंठ कुकडे तपास करीत आहेत.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!