गडचिरोलीत भ्रष्टाचारावर प्रशासनाचा वज्राघात; कोट्यवधींच्या घोटाळ्यांना चाप!

गडचिरोली,१० एप्रिल : धान्य खरेदी आणि साठवणुकीतील कोट्यवधींच्या गैरव्यवहारांना कायमस्वरूपी थांबवण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने भ्रष्टाचाराविरुद्ध थेट लढाई छेडली आहे! गेल्या दोन महिन्यांपासून ॲक्शन मोडवर असलेले प्रशासन दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी निलंबन, वसुली, चौकशी आणि गुन्हे दाखल करण्याच्या कारवायांनी भ्रष्टाचार्यांना धडकी भरवली आहे. हा वज्राघात जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या जाळ्याला उद्ध्वस्त करण्याचा संकल्प दर्शवतो.
अहेरीत हादरा:
शासकीय धान्य गोदामातील अपहाराने सुरुवात झाली. गोदाम व्यवस्थापक आणि रक्षक निलंबनाच्या फेऱ्यात अडकले, तर २२.४२ लाखांची वसुली सुरू झाली. सहा अधिकाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार आणि ट्रान्सपोर्टरलाही नोटीस!
सिरोंचात भूतकाळ जागा :
२०११ च्या धान्य अपहाराचे भूत पुन्हा समोर आले. २४.८ लाख वसुलीसह दहा अधिकाऱ्यांना चौकशीच्या कचाट्यात ओढले जाणार आहे.
देऊलगावचा धक्कादायक खुलासा:
कुरखेड्यातील आदिवासी विकास संस्थेत २०२३–२४ मध्ये ३९०० क्विंटल तांदळाचा अपहारउघड झाला. १.५३ कोटींची वसुली आणि गुन्हे दाखल करण्याचे आदेश जारी झाले असून, या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
प्रशासन थांबले नाही! जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये धान्य साठ्याची १०० टक्के तपासणीचे फर्मान निघाले आहे. २ एप्रिलच्या पॅडी होर्डिंग कोऑर्डिनेशन कमिटीच्या बैठकीत नियम तोडणाऱ्या राईस मिलर्सना धडा शिकवण्याचा निर्धार झाला. २०११ च्या लोडिंग घोटाळ्यातील २.६७ कोटी दंडापैकी १.३५ कोटी वसूल झाले, तर उरलेले ७२ लाख वसूल करण्यासाठी १३ मिलर्सच्या मालमत्तांवर जप्तीचा बडगा उगारला गेला आहे.
“धान्य खरेदी आणि साठवणीत अपहाराला थारा नाही. दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि भ्रष्टाचाराला मुळापासून उखडून टाकू,” असा दणदणीत इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या धडक कारवायांमुळे भ्रष्टाचाराचे कंबरडे मोडेल आणि शासकीय योजनांचा खरा लाभ गरजूंना मिळेल, अशी आशा जिल्हा वासियांमध्ये पसरली आहे. गडचिरोलीत आता भ्रष्टाचाराला ‘नो एन्ट्री’चाबोर्ड लागला आहे!