पर्यावरण बचाओ, वसुंधरा सजाओ: महाराष्ट्रात जागतिक वसुंधरा दिन ते महाराष्ट्र दिनापर्यंत भव्य पर्यावरण संवर्धन मोहीम

मुंबई, 19 एप्रिल : पर्यावरणातील बदलांचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने जागतिक वसुंधरा दिन (22 एप्रिल 2025) ते महाराष्ट्र दिन (1 मे 2025) या कालावधीत “माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत “पर्यावरण बचाओ, वसुंधरा सजाओ” या ब्रीदवाक्यासह राज्यव्यापी पर्यावरण संवर्धन मोहीम जाहीर केली आहे. पंचमहाभूतांवर (भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश) आधारित उपक्रमांद्वारे पर्यावरण जागरूकता वाढवणे आणि वसुंधरेचे संरक्षण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम “आमची शक्ती, आमचा ग्रह” (Our Power, Our Planet) आहे, जी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीवर भर देते.
अभियानाचे उद्घाटन आणि प्रमुख उपक्रम
22 एप्रिल रोजी मा. पर्यावरणमंत्री पवई तलाव स्वच्छता मोहिमेद्वारे अभियानाचे राज्यस्तरीय उद्घाटन करतील. यानंतर विभागीय, जिल्हा, तालुका, ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवले जातील. 22 ते 24 एप्रिल दरम्यान नद्या, ओढे, नाले, तलाव आणि समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम आयोजित होईल. या मोहिमेत स्थानिकलोकप्रतिनिधी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग असेल, ज्यामुळे स्थानिक पातळीवर स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचेल.
शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम
25 ते 27 एप्रिल दरम्यान शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये Reduce-Reuse-Recycle (कमी करा, पुन्हा वापरा, पुनर्चक्रीकरण) या तत्त्वांवर आधारित प्रकल्प आणि स्पर्धांचे आयोजन होईल. प्रत्येक स्तरावर उत्कृष्ट तीन प्रकल्पांची निवडकरून त्यांना प्रमाणपत्राद्वारे सन्मानित केले जाईल. 28 ते 30 एप्रिल दरम्यान “पर्यावरण बचाओ, वसुंधरा सजाओ” या ब्रीदवाक्यावर आधारित स्पर्धा आयोजित होईल. यातून निवडलेली तीन उत्कृष्ट ब्रीदवाक्ये पुढील वर्षीच्या पर्यावरण कार्यक्रमांमध्ये वापरली जातील आणि जिल्हास्तरीय जाहिरात फलकांवर प्रदर्शित केली जातील.
पंचमहाभूतांवर आधारित दैनंदिन उपक्रम
22 ते 30 एप्रिल या कालावधीत दररोज पंचमहाभूतांपैकी एका घटकावर लक्ष केंद्रित करून उपक्रम राबवले जातील. शाळा–महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि इतर स्पर्धांचे आयोजन होईल, ज्यांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता वाढवणे आहे. या उपक्रमांमुळे तरुण पिढीला पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी समजेल.
महाराष्ट्र दिनी समारोप
1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व स्पर्धांमधील विजेत्यांचा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होईल. यासोबतचप्रदूषणमुक्त महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा संकल्प घेतला जाईल. या अभियानाला व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी प्रसार माध्यमांसह फेसबुक, ट्विटर यासारख्या सामाजिक माध्यमांचा वापर होईल. सर्व उपक्रम #MajhiVasundhara हॅशटॅगद्वारे शेअर केले जातील.
1 मे 2025 नंतरही “माझी वसुंधरा अभियान” आणि इतर माध्यमांद्वारे पर्यावरण संरक्षणाचे उपक्रम नियमित सुरू राहतील. “हे अभियान केवळ उपक्रमांपुरते मर्यादित नाही, तर प्रत्येक नागरिकाने पर्यावरणासाठी छोटेसे पाऊल उचलावे, ही अपेक्षा आहे. एकत्र येऊन आपण वसुंधरेला हिरवीगार आणि प्रदूषणमुक्त करूया!”